लोकं काय म्हणतील ? (What will people say?)

चांगल्या कार्यासाठी लोकांचा विचार करू नका. उलट, ज्‍या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते, ती गोष्ट एकदा तरी करून पहा. घाबरू नका, स्वत:चा आत्मविश्वास वाढू द्या. शक्‍ती ही शारीरिक क्षमतेवर अवलंबून नाही, तर दुर्दम्य इच्‍छा शक्‍तीवर अवलंबून असते. परिश्रमावर आणि सातत्यावर विश्वास ठेवा.

बाप-लेकाची जोडी गाढवाला घेऊन जात असते. मध्ये त्यांना एक वाटसरू भेटतो व त्यांना म्हणतो काय मूर्ख माणसं आहेत, गाढव रिकामं चाललं, तुमच्‍यापैकी एकाने त्यावर बसायला नको का? लगेच बापाने मुलाला गाढवावर बसविले आणि ते पुन्हा चालायला लागले. थोड्या वेळाने पुन्हा एक वाटसरू भेटला. तो म्हणाला, ‘अरे मूर्ख मुला, तू स्वत: गाढवावर बसला आणि वृध्‍द पित्याला चालायला लावतोस.’ लगेच मुलगा उतरला व वडील गाढवावर बसले आणि चालायला लागले. पुढे पुन्हा एक व्यक्‍ती भेटला व म्हणाला, ‘काय वडील आहेत? लहान मुलाला चालायला लावत आहेत आणि स्वत: आरामात गाढवावर बसलेत!’ आता मात्र दोघांचीही पंचाईत झाली. त्यांनी दोघांनीही गाढवावर न बसण्याचे ठरविले आणि लोकांनी काही म्हणू नये म्हणून गाढवाचे पाय बांधून गाढवाला उचलून चालायला लागले. थोडे पुढे गेल्यावर एक भटजी त्यांना भेटला आणि ते दृष्य पाहून हसायला लागला. ‘काय मूर्ख माणसं आहेत, गाढवावर बसायचे तर स्वत: गाढवाला उचलून घेऊन चालले.’ इतर लोकंही ते दृष्य पाहून हसत होते. म्हणून त्यांनी गाढवाला खाली उतरविले आणि दोघंही गाढवावर बसले थोडं पुढे जात नाही तोच एक शेतकरी भेटला व म्हणाला, ‘काय तुम्हाला डोस्क-बिस्क आहे की नाही, जीव घ्याल काय त्या बिचा-या गाढवाचा?’ आता मात्र त्या पिता-पुत्राला काय करावं तेच समजत नव्हतं. गाढवाला चालत पुढं नेणं त्यांच्‍यासाठी कठीणच झालं. गाढवावर बसतो तरी लोकं बोलतात, नाही बसलं तरी लोकं बोलतात ! तेवढ्यात एक विद्वान त्या रस्त्याने जात होते. त्यांनी त्या दोघांना पाहून त्यांच्‍या गोंधळाचे कारण विचारले. त्यांची कहाणी ऐकून विद्वान म्हणाले,’’तुम्हाला जे योग्य वाटते तेच तुम्ही करा. लोकांच्‍या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका. आपण करीत असलेल्या कार्याने दुस-याला नुकसान होणार नसेल, तर चिंता करण्याचे कारण नाही. लोकांना जे बोलायचे ते बोलू द्या!’’

विद्यार्थी जीवनातही अशा गोष्टींमुळे गोंधळ उडतो, कमी गुण पडले तर लोकं काय म्हणतील, नापास झालो तर लोकं काय म्हणतील. थोडक्यात, आपल्या जीवनातील बराच काळ ‘लोकं काय म्हणतील?’ अशा शंकेने आणि त्यानुसार वागण्यात निघून जातो. चांगल्या कार्यासाठी लोकांचा विचार करू नका. उलट, ज्‍या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते, ती गोष्ट एकदा तरी करून पहा. घाबरू नका, स्वत:चा आत्मविश्वास वाढू द्या. शक्‍ती ही शारीरिक क्षमतेवर अवलंबून नाही, तर दुर्दम्य इच्‍छाशक्‍तीवर अवलंबून असते. परिश्रमावर आणि सातत्यावर विश्वास ठेवा. काही लोक फक्‍त जिंकण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, काही जण खडबडून जागे होऊन अविरत परिश्रम करून यशाला गवसणी घालतात, ते लोकं काय म्हणतील, याला फारसे महत्त्व देत नाहीत.

(  See SanjayNathe.com for similar articles  .)

1 thought on “लोकं काय म्हणतील ? (What will people say?)”

Leave a Comment